Skip to main content

आजही दुविधेतच -----!!! भाग सहा


*आजही दुविधेतच*
*भाग-सहा*

           किरणने सूर्या सोबत बोलण्यास आणि भविष्यात कसलाही संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला.तरीही सूर्या हा तिचे बाबतीत सकारात्मक भूमिकेतच राहिला.प्रेमप्रकरणाची सर्व दूर चर्चा झाली व तिच्या वडिलांना सर्व काही माहित पडल्याने कदाचित ती घाबरली असावी असाच काहीसा तो विचार करायला लागला.किरणच्या प्रती प्रचंड आस्था अनं प्रेम कायम होतं.त्यानं किरणला दोष देण्यापेक्षा स्वतःलाच सावरून घेण्याचा प्रयत्न केला.एकीकडे किरणनं कुठलेही संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला अनं दुसरीकडे कित्येक महिन्याच्या फरकानंतरही तिच्या वडिलांचा राग आहे तसाच होता.कालांतराने किरण सुद्धा तिच्या शब्दावर/मतावर ठाम होती.तिच्या व्यवहारात कसल्याही प्रकारचं परिवर्तन दिसून येत नव्हतं.त्यामुळं सूर्याचं हळवं मन अधिकच विचलित व्हायला लागलं.असं असूनही तो प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनाक्रमाला तितक्याच ताकदीनं एकाकी झुंज देत होता.वेळोवेळी येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत होता.प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी काळजीचा/चिंतेचा ठरत होता.अशाही स्थितीत तो पूर्णपणे आशावादी होता.एक ना एक दिवस सर्व काही सुरळीत होईल अशी आस बाळगून होता.तिच्या सहानुभूतीसाठी अनं एक एक शब्द ऐकण्यासाठी आतूर झाला होता.पण प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी निराशाच घेऊन येत होता.दिवसेदिवसं तो अधिकाधिक हतबल व्हायला लागला.तहान भूक विसरला.अभ्यासाकडं दुर्लक्ष व्हायला लागलं.भविष्यात किरण आपल्या सहवासातून नेहमीसाठी निघून जाणार की काय ही भीती मनात घर करायला लागली.सूर्या निराशा आणि विवंचनेत चाचपडत असताना किरण कधी नव्हे इतकी आनंदी दिसायला लागली.जणूकाही तिच्या आयुष्यात असं काहीच घडलं नाही वा सर्वदूर कुठलीच बदनामी झाली नाही अशाच काहीशा अविर्भावात ती वावरत होती.तिच्या आनंदात अनं सुखातच सूर्याचा खरा आनंद लपला होता.पण तिच्या अशा वागण्यात सूर्याच्या प्रती कसलीच आस्था, प्रेम असं काहीच दिसत नव्हतं.उलट त्यांच्या प्रति प्रचंड राग अनं द्वेष तितकाच ओतप्रोत भरलेला होता.तिच्या भेटीसाठी अनं तिच्या सोबत बोलण्यासाठी आस लावून असलेल्या सूर्याला किरणच्या वागण्याचं रहस्य काही उलगडत नव्हतं.सूर्या तिच्या भेटीसाठी आटोकाट प्रयत्न आणि तळमळत होता तर दुसरीकडे किरण कडून कसल्याही प्रकारचा प्रयत्न तर नव्हताच शिवाय त्याच्यासोबत ती फटकून वागायला लागली होती.दूर दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती.इतकेच काय तर कधी ती दूरवरून सूर्याला भेटली वा दृष्टीत पडली किंवा आमना-सामना झाला तर ती सूर्याकडं ढुंकूनही बघत नव्हती.इतका द्वेष तिच्या नसानसात भरला असल्याची जाणीव सूर्याला होत होती.ती अशी का वागतय ते कळायला मार्ग नव्हता.तिने असे वागण्याचे वा दूर जाण्याचे कारण कधी काही सांगितले नाही."सर्वीकडे बदनामी करून ठेवली,काय ठेवलं बोलायचं" एवढच काय ते सांगून मोकळी झाली !!.
      सात आठ महिन्याचा अवधी उलटून गेला.उन्हाळ्याची चाहूल लागली.त्यातच सूर्याच्या पदवीच्या द्वितीय वर्षाची परीक्षा सुरू झाली.यावर्षी त्याच्या अभ्यासाची गती पूर्वीप्रमाणे नक्कीच नव्हती.त्याचं शैक्षणिक भविष्य पणाला लागलं होतं.अभ्यासात पहिल्या रांगेत असलेला सूर्या त्या कालखंडात मागच्या रांगेत ढकलला गेला.हेमंत व त्याच्या सहकार्याकडून होणारी बदनामी आणि किरणच्या वडिलांच्या मनात धूमसत असलेला प्रचंड राग या सर्व प्रकाराला तोंड देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते.अशा विचित्र अवस्थेत तो अभ्यासात कसा रमणार ! त्यातच त्याला एका दुर्धर आजाराने (Appendix operation) ग्रासले.अशाही स्थिती तो परीक्षेला बसला.त्याची परीक्षा अंतिम टप्प्यात आली.त्याच दरम्यान ०२ मे १९९५ या दिवशी सूर्याचा राज्यशास्त्राचा पेपर होता.तो पेपरसाठी शहराकडे जायला निघाला.गावच्या बस स्टॉपवर आला.अचानक त्याच्या नजरेत किरण पडली.त्यावेळी तिनं कथिया रंगाचा पंजाबी ड्रेस तर सूर्यानं हिरव्या रंगाचा पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला होता.दोघांची अप्रत्यक्ष भेट गावाच्या बस स्टॉपवर झाली.कदाचित ती सुद्धा शहराकडे जायला आली होती.तिच्यासोबत अजयची धाकटी बहीण कृतिका ही सोबत होती.ते दोघेही एका ठिकाणी (सूर्या किरण एकमेका सोबत बोलले नाही) आले.बस येईपर्यंत सूर्या किरणकडे एकटक नजर ठेवून होता.किरणने सूर्याकडे पूर्वी प्रमाणे काही बघितलं नाही.ती तिच्याच आविर्भावात होती.दोघेही एकाच बसने शहरात पोहचले.किरण तिच्या कामी गेली तर सूर्या पेपरला निघून गेला.पेपर संपताच तो काही वेळाने शहरातील साईनाथ पान सेंटर जवळ उभा राहिला.तद्नंतर पाच दहा मिनिटाचे फरकाने त्याचा मित्र गजाहू सुद्धा पान सेंटर जवळ आला.किरण आणि तिच्या सोबत असलेली इतर मंडळी पहिलेच बस स्टॉपवर येऊन बसली होती.त्या पान सेंटर वरून बस स्टॉप वरील सर्वच मंडळी सहज दृष्टित पडत असे.किरण शहराच्या ठिकाणी शिकायला असताना आणि त्यावेळी ती बस स्टॉपवर आल्यानंतर सूर्या त्याच पान सेंटरवर उभा राहून बस येईपर्यंत तिला न्याहाळत असे.सूर्या अनं गजाहू चर्चेत रमलेत.सूर्याची नजर तशी किरण कडेच होती. अचानक गजाहूने सूर्याच्या काळजाला छेद देणारी गोष्ट सांगितली.मुलींनी लग्नापूर्वी जे कृत्य करायला नको होतं नेमकं तेच कृत्य किरणच्या हातून घडलं असल्याचं त्यांनं सूर्याला सांगितलं.अचानक ही बाब ऐकून सूर्या आश्चर्यचकित झाला आणि धक्काही बसला.हे सर्व ऐकूण सूर्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला.तो एकदम शून्यात गेला.तो पूर्णतः कोसळला.पण इतकं समजूनही तो स्वतःला सावरायला लागला.स्वतःच स्वतःला धीर देऊ लागला.तरी सुद्धा त्याचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नव्हता.किरण असे काही करूच शकत नाही यावर तो ठाम होता.सूर्या: किरण बाबतीत काही एक चुकीचं ऐकून घेण्यास तयार नव्हता.आजही त्याचं असचं धोरण आहे.त्याचे दृष्टीने जणू काही जगात तिच्यापेक्षा दुसरं कुणीच साधभोळ नाही असं त्याच्या मनात घट्ट बसलं आहे.गावात जे काही घडतंय,चर्चिल्या जातय तेच तुला सांगतोय असं गजाहून ठणकावून सांगितलं.तसं त्याचं म्हणणं काही खोटं नव्हतं.अजय आणि किरणच्या संबंधा बाबतची चर्चा दुसरीकडूनही ऐकायला येत होती.तरीही त्यांच्यात असले काही संबंध आहे असं मानायला तो अजूनही तयार नव्हता.उलट तो किरणच्या चारित्र्याची वकिली करायचा.तो किती दिवस मनावर घेणार नाही? किती दिवस गावातील चर्चेवर आणि मित्रमंडळीवर अविश्वास ठेवणार? अगोदरच सूर्या आणि किरणची सर्वदूर चर्चा आणि तिच्या आई-वडिलांना माहिती होऊनही तिच्यावर अपेक्षेइतका परिणाम दिसत नव्हता.सूर्याकडे तर तिनं पूर्णपणे पाठच फिरविली होती.कदाचित तिच्या आनंदी आणि उत्साही वागण्याचं रहस्य होणाऱ्या चर्चेत तर नाही ना ! असं हळूहळू त्याच्या मनात घर करायला लागलं.पण त्यांनं असं मत कधीच कुणाजवळ मत व्यक्त केलं नाही.उलट तो सलग किरणचीच बाजू घेत राहिला.
      आता अजय आणि किरण यांच्या संबंधाबाबत सर्वदूर चर्चा व्हायला लागली.ज्याच्या त्याच्या मुखातून हीच चर्चा वारंवार ऐकायला येऊ लागली.त्या दोघांचे प्रेम प्रकरण (शारीरिक आकर्षणातून) ऐकून सर्वजण अचंबित आणि अवाक व्हायला लागले.दोघातील नातेसंबंध आणि वयाचं अंतर लक्षात घेता त्यांच्यात असले काही संबंध प्रस्थापित होऊच शकत नाही अशी ही चर्चा दबक्या स्वरात व्हायला लागली.सूर्याचाही असाच कयास होता.कारण ती बालपणी कदाचित त्यांच्या अंगाखांद्यावर खेळली असेल ! इतकं त्यांच्या वयात अंतर होतं.अशा स्थितीत ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडणार अनं असले शारीरिक संबंध कसे ठेवणार असा प्रश्न उपस्थित होत असे.असे असले तरी त्यांच्यात संबंध आहेच ही चर्चाही तितक्याच ताकदीने व्हायला लागली होती.तत्पूर्वी सूर्या अनं किरण यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गावात रंगली होती.त्यात हे प्रकरण उघड झालं.किरण नेमकी कुणाच्या प्रेमात पडली आहे हे लोकांना कळेनासं झालं.आता सूर्या किरणच्या प्रेमाची चर्चा मागे पडू लागली.अजय किरणच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चेने अधिक गती घेतली होती.सूर्याच्या प्रेमाची चर्चा ही पडद्याआड व्हायला लागली.विशेष म्हणजे सूर्या किरणचे प्रेमप्रकरण असल्याने काही लोक सूर्या समोर मुद्दाम अजय किरणच्या प्रेमाची चर्चा करीत असे.त्याला डीवचवण्याचा प्रयत्न करीत असे.आपल्याला प्राणाहून प्रिय असलेल्या किरणचे अजय सोबत जोडलेले नाव सूर्याला काही केल्या सहन होत नव्हते.त्याच्या प्रेम प्रकरणाची चर्चा अनं त्याचे नको ते किस्से,तिच्या बाबतीत होणारी अश्लील चर्चा हे सूर्याच्या काळजाचे पाणी पाणी करीत असे.या चर्चेने सूर्याची तर पूर्ण झोपच उडाली होती.क्षणोक्षणी त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे व्हायला लागले.इतकी खमंग चर्चा होऊनही सूर्याचा किरणवरील विश्वास अढळ होता.त्याच कालावधीत ०३ मे ते ०८ मे १९९५ च्या दरम्यान ती गर्भपात करून आल्याची चर्चा पुन्हा सर्व दूर पसरली.हे ऐकून सूर्याचं काळीज फाटलं.ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा अधिक रंगत होती.सूर्याचं नाव तर कधीचचं मागे पडलं होतं.तिच्या नव्या प्रेमप्रकरणात सूर्याचे नाव कधीचेच वावटळीत वाहून गेलं होते अर्थात सूर्याचं नाव आता इतिहास जमा झाला होतं.
       सत्य परिस्थिती प्रकाशझोतात आली आणि सूर्याच्या आयुष्याची पूर्ण माती झाली.त्याचं जगणं मुश्किल झालं.हे सर्व ऐकून तो पूर्णपणे खचला.मानसिक मनोबलही  खालावलं.जिवापाड प्रेम करूनही ती सूर्यापासून दुरावली.आता त्यानं तिच्या भेटीसाठी पूर्वीप्रमाणे तिच्या घराकडे जाणं थांबवलं.रात्रंदिवस तो तिच्याच विचारात अडकला.तहान भूक सर्व काही विसरला.लोकांच्या नजरेतही पडला.लोकांच्या डीवचवण्याच्या प्रकाराने तर तो अधिकच हिरमुसला.त्याच्यातील आनंदी आणि उत्साहीपणा हरवून बसला.त्याच्यासोबत झालेला अघोरी खेळ त्याच्या अगदी जिव्हारी लागला.आपण कुठे चुकलो,आपल्याला का नाकारलं याबाबतीत चिंतन करण्यास गुंतला.तिला दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष देऊ लागला.सूर्याच्या हातून नेमकी कोणती चूक घडली हे किरणने त्याच्या लक्षात आणायला हवं होतं पण तिच्याकडून असा काही प्रयत्न झाला नाही.किरण अशा प्रकारे का वागली असेल याबाबतचं रहस्य त्याच्याकडून उलगडता उलगडता काही उलगडत नव्हतं.तिला अजयच्याच प्रेमात पडायचं होतं तर सूर्याच्या प्रेमात का पडली असे एक ना अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिलेत.त्याचं उत्तर मात्र त्याला काही मिळत नव्हतं.उत्तर मिळविण्याचा मार्गही गवसत नव्हता.अंधारातून आंधळ्या माणसाने कसे पुढे जावे अशी सूर्याची गत झाली होती.त्याच्या या प्रकरणाने त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पूर्णपणे हरविलं होतं.निराशा मात्र भरभरून त्याच्या पदरी पडली होती.निराशेतच तो आशेचा किरण शोधत होता.पण पुढील चित्र मात्र धुसर झालं होतं.भावी जीवनाचं रंगविलेलं स्वप्नही भंगलं होतं.प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठी कसोटीचा ठरत असे.काळाच्या ओघात तोही वाहून जात आहे याचीही त्याला जाणीव होत नव्हती.भविष्यात तो काय करणार आहे हेही त्याला कळत नव्हतं.मनाशी ठरवलेलं ध्येय कधीचचं धुळीत मिसळलं.त्याच्यावर आभाळाएवढा दुःखाचा डोंगर कधी आणि केव्हा कोसळला हे त्याला कळलंच नाही.त्याच्या दृष्टीने हे सर्व अनपेक्षित आणि अचानक घडलं होतं.विरह त्याच्या जगण्याचं माध्यम झालं होतं.रात्रंदिवस जागून स्वतःच दुःख स्वतःच पचवीत होता.चार-पाच महिन्याचा कालावधी उलटून गेला पण त्याचं दुःख, वेदना,यातना काही केल्या कमी होत नव्हत्या.उलट त्यात दिवसेंदिवस भरच पडत होती.त्याचा प्रत्येक दिवस त्याने किरणच्या आठवणीला अर्पण केला होता.त्याच्या अशा वेदना तो कुणाजवळ व्यक्तही करू शकत नव्हता.त्याचं ऐकून घेणारं असं हक्काचं कुणी व्यक्ती नव्हतं.जे पाठीराखे (सानिया-समीर) होते त्यांनी अगोदरच पाठ फिरवली होती.हे त्याचं दुर्दैवच म्हणावे लागेल.किरणला सूर्याचं अंतर्मन  कधी कळलेच नाही.अशातच ०४ नोव्हेंबर १९९५ रोजी गावातील शाळेजवळील वॉटर सप्लाय जवळ समीर आणि किरणची गाठभेट झाली.त्यांच्यात बोलणं झालं.त्यावेळी किरणने सूर्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.सोबतच सूर्याच्या बाबतीत सहानुभूतीही दाखविली.तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी सूर्या तिला भेटण्याच्या मानसिकतेत नव्हता.सर्व काही उघड झाल्यानं तिला भेटून काय करायचं असंच त्याला वाटायला लागलं.म्हणून सूर्याकडून तिला भेटण्याचा नंतर काही प्रयत्न झाला नाही.इतकं सर्व घडूनही तिने सूर्याला भेटण्याची इच्छा का व्यक्त केली याबाबत सूर्या आजही दुविधेतच आहे.
       सूर्याच्या जीवाभावाच्या सर्व सख्या- सखींनी साथसंगत सोडली.दुविधा अवस्था आणि नैराश्याने सूर्याची कधी साथ सोडली नाही.म्हणून तो प्रत्येक वेळी दुविधेत अडकला.समीर सानियाने कधीचेच हातवर केले होते.सर्वदूर चर्चेने सूर्याचा प्रत्येक दिवस हा काठिन्यांनं भरलेला होता.धैर्य आणि मनोबल कधीचच खचलं.त्यातच तिच्या वडिलांचा राग मात्र अद्यापही शांत झाला नव्हता.त्याच्या रागाची आणि संतापाची तीव्रता अधिक वाढलेली होती.सूर्याला अपमानित करण्यास आणि नको ते बोलण्यास कधीच मागेपुढे पाहत नसत.तरीही सूर्या त्यांना शब्दानेही प्रत्युत्तर देत नव्हता. याबाबतीत त्याचं त्यालाच समजत नव्हतं.किरणने सूर्याचं प्रेम नाकारलं,त्याला झिडकारलं.ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली.नको ते कृत्य करून चुकली.तरी सुद्धा ती सूर्याच्या काळजात घर करून का बसली आहे हे त्यालाही कळत नव्हतं.तो अंतर्मनातून दुखावला,मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालं तरी तो तिच्यावर पूर्वीप्रमाणेच जीव ओवाळतोय.तिच्या प्रती त्याच्या मनात तसूभरही प्रेम कमी झालं नव्हतं.किरण ही केवळ शरीरानं दूर गेली अंतकरणातून नाही.इतकं निर्मळ प्रेम सूर्याचं किरण वर जडलं आहे.सूर्याचे प्रेम तिच्या शरीरावर नव्हे तर तिच्या निर्मळ मनावर,सालस स्वभावावर आहे.तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या बोलण्याच्या शैलीचा तर तो अधिक दिवाना आहे.पण सूर्याचं अस्सल खर प्रेम आणि निर्मळ मन तिला कधी कळलंच नाही.
        दिवसा मागून दिवस आणि महिने मागून महिने पुढे सरकत होते.सूर्याला कळून चुकलं की,आता किरण कधी त्याच्या आयुष्यात काही येणार नाही.पण त्याचं तिच्यावर प्रचंड प्रेम होतं,आहे,आणि आजन्म राहील.म्हणूनच त्यांनं त्याच कालखंडात त्याच्या डाव्या हातावर कायमस्वरूपी तिचं नाव कोरून घेतलं.आजही तिचं कोरलेलं नाव त्याला तिची नित्यक्रमानं आठवण करून देतय. 
     मध्यंतरीच्या काळात पुन्हा अजय आणि किरणच्या संबंधातील चर्चेने डोकं वर काढलं.आता ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार की काय अशी चर्चा व्हायला लागली.किरणने सूर्या आणि अजय या दोघांपैकी सूर्याला नाकारलं,झिडकारलं आणि अजयला स्वीकारलं, कवटाळलं होतं.अशाही वेळी त्याचा संयम कायम होता.म्हणून ती आपली झाली नाही म्हणून ती दुसऱ्याची पण होऊ शकत नाही असं मानणाऱ्यापैकी सूर्या हा नक्कीच नव्हता.शेवटी तिच्या पसंतीला आपली पसंती समजू लागला आणि स्वतःला सावरून घेऊ लागला.तिच्या सुखातच आपलं सुख शोधू लागला.म्हणून अखेर तो कायमस्वरूपी बाजूला झाला.तिला भेटण्याचं किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न थांबविला.ती आता आपली नाहीच असे समजून ती जरी दूर गेली तरी तिला कायम जपायचं असंच काहीसं त्यांनं ठरवलं.त्याच दिशेने त्याची पाऊलेही पडायला लागलीत.पण ते दोघे कदापिही विवाह बंधनात अडकू नये असं त्याला मनोमन वाटत होतं.ती आता इतरांच्या बाहुपाशात अनं तेही आपल्याच गावात कायम राहणार आणि आपणही त्याच गावी राहणार ही कल्पनाही त्याला सहन होत नव्हती.कारण की,कारण ती गावात राहणार असेल तर स्वतःला कायम वेदना होणार शिवाय आयुष्यभर तिला भेटता येणार नाही,संवाद साधता येणार नाही हे ही तितकंच खरं होतं.त्याचं दुर्दैव असं की,त्याला जे व्हायला नको होतं नेमकं तेच घडलं.सूर्या तब्बेतीच्या निमित्ताने तो जिल्ह्याच्या ठिकाणी गेला होता.डॉक्टराचा सल्ला आणि तपासणी पश्चात तो रविवार दिनांक १८ फेब्रुवारी १९९६ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान गावी परतला.तेव्हा अजय अनं किरण विवाहबद्ध होणार आहे अशी चर्चा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली.हीच चर्चा गावातही वाऱ्यासारखी पसरली.तो आजारातून पूर्णतः बरा झाला नाही आणि त्यात अशी बातमी त्याच्या जवळ येऊन धडकली.त्यावेळेस सूर्याची अवस्था कशी असेल हे केवळ त्यालाच कळत होतं.आता कधी नव्हे इतका कायमस्वरूपी त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार होता.असे काही घडले तर तिच्याकडे जाणारे सर्व मार्ग कायमस्वरूपी बंद होण्याची ही नांदी होती.त्यातच तिचा विवाह वादग्रस्त ठरला होता.पुन्हा ती काही महिन्याची गर्भवती असल्याचं कारणही पुढे आलं.कदाचित त्यांचा विवाह झाला नाही तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.अशा प्रकारची धमकी त्यांच्याकडून आली होती.किरणच्या दृष्टीने सुद्धा हा विवाह होणे अनिवार्य होता.तशी परिस्थिती निर्माण झाली होती.किरणच्या या लग्नाला तिच्या आई-वडिलांचा प्रचंड विरोध आणि स्पष्ट नकार होता.पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लेकीच्या प्रेमासाठी अखेर त्यांनी या लग्नाला मूक संमती दिली.दि.२३ किंवा २४ फेब्रुवारी १९९६ शुक्रवार/शनिवार रोजी विवाह नोंदणी करवून घेतली.कायदेशीररित्या ते आता पती-पत्नी झालेत.अजय आणि किरण अखेर स्वमर्जीने विवाहबद्ध झालेत.रेशीमगाठीत अडकले.दि.०२ मार्च १९९६ रोजी त्यांच्या लग्नाप्रित्यर्थ प्रीतीभोज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.सर्व गावभर याच लग्नाची उत्सुकतेने चर्चा होती.सोबतच काही लोक तसेच समवयस्क मित्रमंडळी सूर्याला बघून वा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून मुद्दाम हाच विषय हाताळायचे.न सांगताही त्याला आकसाने प्रीती भोजनाला येण्याचा आग्रह करीत असे.ते सर्व ऐकून तो न ऐकल्यासारखा करीत होता.तो पहिलेच आजारी.त्यात अशा हितशत्रूच्या वागण्याने तो अधिक आजारी पडल्यागत झाला होता. 
         आता खऱ्या अर्थाने ते दोघेही कायदेशीर आणि सामाजिक रितीरिवाजाला साक्षी ठेवून विवाहबद्ध झालीत.त्यांच्या सुखी संसाराला प्रारंभ झाला.किरणने भावी जीवनाचं रंगविलेलं स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं तर सूर्याचा स्वप्न मात्र कायमचं भंगलं.तिच्या मर्जीनुसार तिचा संसार थाटला.पारिवारिक जीवन आनंदाने सुरू झालं तर दुसरीकडे सूर्या स्वतःचं दुःख अनं वेदना बाजूला ठेवून तिच्या आनंदाला आपला आनंद समजू लागला.ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड निस्सीम प्रेम करतो त्या व्यक्तीच्या आनंदातच आपला खरा आनंद आहे असं मानणाऱ्यापैकी सूर्या आहे.पण ती आपल्याला कधीच भेटणार नाही वा कधी संवाद साधण्याची संधी मिळणार नाही याचं शल्यही त्याला तितकच बोचत होतं. यदाकदाचित ती दूर अंतरावरून नजरेत पडली तरीही तिच्याशी बोलणं किंवा भेटणं अवघड होणार होतं म्हणून तो अंतर्मनातून फारच दुखावला.होणाऱ्या यातना सहन होत नव्हत्या.भविष्यात तिचा सूर्या ऐवजी कुणाशी तरी विवाह होणारच होता पण ज्या पद्धतीने तिचा विवाह व्हायला हवा होता तसा काही झाला नाही.म्हणून तो हिरमुसला.तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध हा विवाह पार पडला.या लग्नाचं दुःख त्यांच्यापेक्षा दुसऱ्या कुणाला अधिक झालं असेल.कारण किरणही त्यांची एकुलती एक लाडात वाढलेली लेक.तिच्या बाबतीत त्यांचेही काही स्वप्न,आशा-आकांक्षा होत्या.क्षणभंगुर सुखाच्या नादी लागून तिच्या आई-वडिलांबरोबरच सूर्याचाही तिने हिरमोड केला.
तिच्या एका निर्णयाने सर्वांची मने दुखावलीत.तिच्या आई-वडिलांची मोठ्याप्रमाणात मानहानी झाली. समाजाला अपेक्षित नसलेल्या नात्याला नाईलाजाने संमती देण्याची त्यांच्यावर वेळ आली.तिच्या आईला तर अधिक त्रास/वेदना झाल्यात.तिच्या आततायी निर्णयाने तिचे आई-वडील तसेच सूर्या खऱ्या अर्थाने बळी ठरलेत.भविष्यात कदाचित तिचे आई-वडील तिला  व तिच्या विवाहाला स्वीकारतील पण सूर्यासाठी तर हे कदापिही शक्य होणार नाही.म्हणून तिचे आई वडील आणि इतरासाठी हे दुःख क्षणिक तर सूर्यासाठी कायमसाठी होतं.कदाचित तिच्या आई-वडिलांच्या मर्जीनुसार किरण विवाहबद्ध झाली असती तर तितकं दुःख नक्कीच वाटलं नसतं.कारण इतर ठिकाणी विवाहबद्ध झाली असती तर कदाचित सूर्याला तिच्यासोबत आजन्म संवाद साधता आला असता.भेटता आलं असतं.चर्चा करता आली असती.पण तिच्या अनपेक्षित निर्णयामुळे हे सर्व त्याच्याकडून हिरावलं गेलं.
      किरण कडून इतकं सर्व घडूनही सूर्या हा किरण प्रति पूर्वीप्रमाणेच प्रामाणिक होता.प्रामाणिक राहील.सूर्या खऱ्या अर्थाने तिच्या बोलण्याच्या मधुर शैलीवर भाळला होता.तो मधुर आवाज आता त्याला कधी ऐकता येईल याची शास्वती नाही.हे त्याला चांगलं ठाऊक आहे.तरीही त्याच्यात काही बदल झाला नाही.सूर्याला किरण कडून जे अपेक्षित होतं त्या सर्व बाबीला नेहमीसाठी तो मुकणार आहे.कारण ज्या अजय सोबत तिचा विवाह झाला आहे त्या अजयला सुद्धा सूर्या आणि किरणच्या पूर्ण प्रेमप्रकरणाची कल्पना आहे.दोन वर्षांपूर्वी तो तिच्या वडिलांसोबत सुर्याकडे जाब विचारण्यासाठी आला होता.तसेच तिच्या आई-वडिलांसह अजय त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत अवगत असल्याने त्यातच अजय व सूर्या हे दोघेही एकाच गावात राहत असल्याने किरणशी कधीच बोलता येणार नाही.संपर्क करता येणार नाही.कालांतराने कदाचित त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या नजरेत पडलं किंवा इतर कुणी त्यांच्याकडे असं काही सांगितलं तर कुठलाच व्यक्ती हा आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध वा लग्न पूर्वीचे प्रियकराशी संबंध ठेवणं वा भेटणं सहन करणार नाही.किरण आणि सूर्याची प्रेम कहाणी तर जगजाहीर होती.मग अशा स्थितीत सूर्याला किरणच्या आसपास जाणे तरी शक्य आहे का? कदाचित असं घडलं तर अजयचा किरणवर असलेला विश्वास कायम राहील का ? अजय किरण यांच्यातील सुखी संसारासाठी तिच्यापासून दूर राहणेच योग्य आहे.त्या दोघाही पती-पत्नीतील विश्वास कायम राहावा व त्यांच्या सुखी संसाराला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी सूर्याने मन घट्ट करून तिच्या नजरेपासून कायम दूर राहण्याचा "पण" घेतला.कारण सूर्याला तिचा संसार उध्वस्त करायचा नव्हता तर तिचा संसार फुललेला बघायचा आहे.तिच्याकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अप्रत्यक्षपणे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं सूर्यानं मनोमन ठरवून घेतलं.स्वतः सर्व काही सहन करायचं पण तिला कधीही दुखवायचं नाही.असाच त्याचा प्रयत्न राहिला आणि आजन्म राहील.सूर्यानं तिच्या घराकडे जाणं किंवा तिच्या घराच्या रस्त्याने जाणं कायमचं बंद केलं.म्हणून सूर्याही कधी तिच्या नजरेत पडणार नाही. वास्तविकता तिची इच्छा नसतानाही सूर्या तिला कधीही भेटू शकला असता.घडलेल्या प्रकारचा/खेळाचा जाब विचारू शकला असता.पण त्यांच्याकडून असा काही प्रयत्न झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही.हा त्याचा भित्रेपणा वाटत असेल पण वास्तवात तसं नव्हतं तर खऱ्या अर्थाने तिच्याप्रती त्याचा प्रामाणिकपणा आणि न व्यक्त होणारं प्रेम होतं.
भविष्यात भेटणं तर दूरच आहे तो तिच्या नजरेवर नजर सुद्धा टाकत नव्हता किंवा पडू देत नव्हता.हे केवळ तिच्या भविष्यातील सुखासाठी/हितासाठी ठरवलं होतं.वास्तविकता गावातील कुण्या रस्त्याने ये-जा करणे काही गुन्हा नाही.तरीही त्यांन तिच्यासाठी तिच्या घराच्या रस्त्याने ये-जा करणं कायमचं थांबविलं.कदाचित वारंवार सूर्या हा तिच्या घराच्या रस्त्याने जात- येत राहिला तर तिच्या पतीला विनाकारण संशय येईल आणि तिचा सूर्या सोबतचा पूर्व इतिहास वेळोवेळी त्याच्या दृष्टी पटलावर घोंगावत राहील आणि त्याचा सर्व परिणाम हा किरणला भोगावे लागेल म्हणून सूर्यांने त्या रस्त्याने ये-जा करणं कायमचं बंद केलं.सूर्याचं किरण वरील अगाध प्रेम हेच त्यासाठी कारणीभूत होतं.
       अजय आणि किरण यांचा विवाह त्यांच्या मर्जीनुसार झाला.त्यामुळे त्यांचं कुटुंब सदासर्वकाळ आनंदिच राहावं असं सूर्याला अपेक्षित होतं.त्यासाठी त्यांला जो काही त्याग करावा लागेल त्यासाठी त्याची तयारी आहे.कधीही किरणच्या वाट्याला येत असलेलं दुःख सूर्याला सहन होणार नव्हतं.इतकंच काय तर गावातील कुणी तिला आडवं-तिडवं व तिच्या पश्चात निंदानानास्ती केली तरी सूर्याला रुचत नव्हतं.ती फक्त सुखी समाधानी आनंदी राहावी हेच त्याला अपेक्षित आहे.तशी ती सुखी समाधानी आणि आनंदी आहेच यात शंका नाही.तिचा संसार हा तसा सुरळीत सुरू होता.तिच्या वागण्या-बोलण्यावरून व तिच्या घराकडील लोकांच्या विचार प्रवाहावरून सहज निदर्शनात येत असे.सर्व काही व्यवस्थित असताना अचानक तिनं आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न सूर्याला चटका देऊन गेला.विवाहाच्या काही दिवसातच तिचे कडून आत्महत्येचा केलेला प्रयत्न (विहिरी वर) सूर्याच्या पचनी पडला नाही.आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामागील नेमकं कारण काही उमगलं नाही.पण किरणने असं आततायी पाऊल उचलनं सूर्याला नक्कीच आवडलं नव्हतं.सर्व काही इच्छेप्रमाणे झालं असताना तिनं आत्महत्येचा प्रयत्न का आणि कशासाठी केला ह्या बाबतीत सूर्या अजूनही दुविधेतच आहे.
      विवाहानंतर हे दोघेही गावीच राहणार असल्याने तिला त्रास व्हायला नको म्हणून तो खबरदारी घेत होता.कदाचित असं काही घडलं तर तो तिच्यासाठी गाव सोडून जाण्यासही तयार आहे/होता.अद्याप तरी तशी परिस्थिती त्यांच्यावर आली नाही.त्यासाठी सूर्याचे प्रयत्न कामी आलेत.कदाचित तो तिच्या घराकडे वारंवार जात राहिला असता वा संपर्कात जाण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित अशी वेळ आली असती.तिला त्रास झाला असता परंतु सूर्याने पुरेपूर काळजी घेतली.खरं प्रेम हे कुणाला मिळविण्यासाठी नाहीतर तिच्या सुखासाठी करावं यातच खऱ्या प्रेमाचं रहस्य लपल असतं.हे सूर्याने कृतीतून दाखवून दिलं.किरणच्या सुखासाठी त्यांने स्वतःच्या सुखाचा त्याग केला.
        सूर्याचे किरणवर प्रचंड प्रेम असलं तरी कुठेतरी त्याच्या मनात रागही तितकाच धगधगत आहे.खदखदत आहे.कारण तिचं प्रेम मिळविण्यासाठी त्याला तब्बल तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली.दरम्यानच्या काळात खोटी चर्चा पसरवून तिच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही झाला.तदनंतर तिला भेटायचं नाही पण आयुष्यभर तिच्यावर कायम केवळ एकतर्फी/अप्रत्यक्ष प्रेम करावं असं ठरवलं होतं.पूर्वीचं तो सर्व काही विसरून कायमस्वरूपी एकतर्फी प्रेम करू लागला होता.फक्त सूर्याचं तिच्यावर प्रेम आहे इतकच तिला कळावं असं त्याला अपेक्षित होतं.असं त्यांन तिची मैत्रीण सानिया कडे सांगितलं होतं.कदाचित सानियानं पण तसंच मत किरण जवळ मांडलं असावं.सूर्याकडून कुठलेही प्रयत्न नसताना काही दिवसाच्या फरकाने किरण आणि सानिया या दोघीही स्वतः सूर्याकडे येऊन प्रेमाची हिरवी झेंडी दाखविली."सानिया कडे व्यक्त  केलेलं सर्व काही चुकीचं असून तुमच्यावर खरं प्रेम करीत असल्याचं तिनं सूर्याला सांगितलं." अनं नव्यानं त्याच्या प्रेमाची फुलबाग बहरली.मात्र ही प्रेमकहानी अल्पावधीतच वाळवंटात परावर्तित झाली.त्याचं प्रेम हे अल्पायुषी ठरलं.सूर्या तर कायम तिच्यावर अप्रत्यक्ष प्रेम करणार होताच मग तिने सूर्याला खोटं सांगून प्रेमाच्या मोहजाळात का अडकिलं.या प्रकाराने सूर्या पूर्णपणे दुखावला.तिच्याकडून सूर्यावर अनापेक्षितपणे झालेला आघात आणि तिचं खोटारडं प्रेम सूर्याने विषासमान पचविलं.म्हणून तिच्यावर जितकं प्रचंड प्रेम आहे,आस्था आहे तितकाच रागही आहे.पण तो कुणाजवळ व्यक्त करित नाही.तिचं स्वार्थीपणाचं वागणं आणि त्याच्या प्रामाणिकपणाचा घेतलेला गैरफायदा तो कदापिही विसरू शकणार नाही.तिनं सूर्यासोबत षडयंत्र रचून अजयचं घर बसविलं आणि सूर्याला कायमसाठी दुःख आणि निराशेच्या गर्तेत ढकलं.स्वतःला निर्दोष ठरवून प्रत्येक प्रसंगाला तिनं सूर्याला कारणीभूत ठरवून अजयच्या प्रेमाला बळ दिलं.जे काही घडलं ते सर्व काही सूर्याकडून घडलं.बदनामीसाठी केवळ सूर्याला जबाबदार ठरवून स्वतःची सूर्याकडून पद्धतशीर सुटका करून घेतली.अशा वागण्यामुळे सूर्याची काय स्थिती होईल याबाबतीत तिने कधीही मागचा पुढचा विचार केला नाही. केवळ स्वतःचा स्वार्थ साधला.इतकं सर्व घडूनही शांत लाजाळू ,निर्मळ मनाची म्हणून त्यानं तिला त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात कायम साठवून ठेवलं.तिच्या भावना जपल्या आणि भावना जपत आहे.तिच्या मनाविरुद्ध कधी व्यवहार केला नाही.कधी वागला नाही.कुणी कितीही ठामपणे सांगितलं तरी कायम तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला.काही अपवाद वगळता तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नव्हता.किरणला दृष्टी पटलावर ठेवून व तिच्या दृष्टीने पूरक असेच निर्णय घेत असे.त्याच्या प्रामाणिकपणाचं त्याला तिनं कोणतं फळ दिलं? दुःख,यातना, वेदना,निराशा,प्रतीक्षा यापेक्षा वेगळं काही तिच्याकडून मिळालं नाही.खरं प्रेम तर औषधालाही मिळालं नाही.विशेष म्हणजे तिचं भावी आयुष्य सुखात जावं यासाठी त्याने तिची वारंवार समजूत काढली.वेळोवेळी सल्ला दिला.मार्गदर्शन केलं.पण तिच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही.कुठल्याच बाबीसाठी आग्रह धरला नाही.सूर्याने सदैव तिलाच जपलं आणि सलग प्रेमाचा वर्षाव केला.त्याचं सर्व ऐकून ती सूर्याला नेहमी म्हणायची की, " तुम्ही जे बोलता, मार्गदर्शन करता, ते सदैव ऐकावसच वाटतं.खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की,तुमच्यासारखे समजूतदार मित्र माझ्या आयुष्यात आले." तिचं भाग्य तर तिनच ठरविलं.सूर्याच्या भाग्याचं काय? हा प्रश्न नेहमीसाठी अनुत्तरीत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...